माध्यमांसमोर पक्षाचे धिंडवडे काढणाऱ्यांवर काँग्रेस नेतृत्वाने कारवाई करावी

काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची मागणी

पुणे : राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय - अस्तित्वासाठी सत्यजीत तांबे व  हंडोरे प्रकरणाचे निमित्त करून व्यक्तिगत हेवेदावे काढण्याकरीता पुढे सरसावल्याचे दिसत आहे.


माध्यमांसमोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढत, पक्षाचीच बदनामी करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रथम पक्षश्रेष्ठींनी त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.


यासंदर्भात बोलताना तिवारी यांनी सांगितले की, खरंतर पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्यांना माध्यमांसमोर न जाता ही आपली बाजू पक्षाध्यक्षांसमोर मांडता आली असती. मात्र, एकीकडे सर्व विचारांती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ‘सत्यजित तांबे प्रकरणी शिस्तभंग समितीचा निर्णय’ जाहीर केला असता, पुन्हा पक्षाध्यक्षांच्या निर्णयावरच एक प्रकारे आक्षेप घेणे प्रकार अत्यंत चुकीचा आहे.


पक्षविरोधी भूमिकेतून, पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणे हेच पक्षविरोधी कृत्य असून, याची गंभीर दखल घेऊन माध्यमांसमोर आरोप करणारे माजी आमदार आशीष देशमुख यांच्यावर पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करणेच गरजेचे आहे.


त्यांनी पुढे म्हटले की, आरोप करणारे नेते, राज्यात तब्बल १६ दिवस खासदार आणि पक्षाचे नेते राहूल गांधींची `भारत जोडो` यात्र चाललेली असताना फारसे कुठेच दिसले नाहीत. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंच्या पराभव प्रकरणी त्याच वेळी केंद्रीय निरीक्षक येऊन चौकशी करून तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधींकडे अहवाल सोपवला गेला आहे.


या प्रकरणी माजी आमदार देशमुख वेगळे काय सांगत आहेत? महाराष्ट्रासह इतर ही प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रीया चालू आहे.. असे असतांना माध्यमांसमोर पक्ष पाचव्या क्रमांकावर जाईल अशी पक्षास खच्ची करणारी निंदनीय वक्तव्ये करण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही.  


राज्यात प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्र्यांसह, सर्व नेते राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी व जाहीर सभांसाठी मार्गावरील जिल्ह्यांमध्ये जाऊन झटत होते. पक्षाध्यक्ष व इतर ही नेते सतत राहुल यांच्यासोबत चालत होते, पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी घालत होते. 


त्यामुळे ‘राज्यात काँग्रेस पक्षास पोषक झालेले वातावरण’ काही नेते स्वअस्तित्वासाठी, अहंभाव व संकुचित हेतुने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशांवर त्वरीत शिस्तभंगाची कडक कारवाई करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments