पं. सुधाकर चव्हाण व उस्ताद रफिक आणि शफीक खान यांच्या कलाविष्काराने समारोप
पुणे : किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. सुधाकर चव्हाण व प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रफिक आणि शफीक खान यांच्या दमदार कलाविष्काराने रविवारी २५ व्या कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता झाली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सादर झालेल्या या बहारदार प्रस्तुतीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवाच्या शेवटच्या दिवशीच्या पहिल्या सत्रात राधानंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक तबला वादन केले. त्यानंतर कलाश्री संगीत महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी गायन सादर केले. त्यांनी राग मुलतानी मध्ये ' कंगन मुंदरिया...' ही विलंबित एक तालातील बंदिश आणि गुरू हा संत कुळीचा राजा हे भजन सादर केले.
त्यानंतर पंडित सुधाकर चव्हाण यांचे गायन झाले. त्यांनी राग भीमपलासीद्वारे आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये 'अब तो बडी बैर ...' ही विलंबित एक तालातील बंदिश, तीन तालात ' जा जा रे अपने मंदिरवा...' ही छोटा ख्याल बंदिश सादर केली. ' विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी ' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना नंदकिशोर ढोरे ( तबला), प्रभाकर पांडव ( हार्मोनियम), गंभीर महाराज (पखवाज), शिवानंद स्वामी, संदीप गुरव आणि नामदेव शिंदे ( स्वर साथ ) यांनी साथसंगत केली.
शेवटच्या सत्रात उस्ताद रफिक आणि शफीक खान यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग चंपाकली'ने आपल्या वादनाची सुरूवात केली. त्यामध्ये आलाप, जोड, झाला, झपताल व तीन तालात दोन रचना सादर केल्या. राग भैरवी'ने त्यांनी महोत्सवाची सांगता केली. त्यांच्या सतार जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांना ईशान घोष यांनी तबल्यासाठी साथ केली.
कार्यक्रमात रौप्य महोत्सवी वर्षाचा ' कलाश्री' पुरस्कार ज्येष्ठ गायक पं. रामराव नायक यांना पं. केशव गिंडे यांच्या हस्ते , तर कलाश्री युवा पुरस्कार तबलावादक पांडुरंग पवार यांना पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, पं. डॉ. विकास कशाळकर, मंडळाचे सदस्य बाळासाहेब सूर्यवंशी, आरती राव, विश्वास जाधव, पांडुरंग मुखडे, सच्छीदानंद कुलकर्णी आणि जवाहर ढोरे उपस्थित होते.
0 Comments