भारतीय संस्कृतीचा आदर केल्यास, जगात शांतता : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विज्ञान, धर्म/ अध्यात्म आणि तत्त्वज्ञानावर 

आधारित १० व्या जागतिक संसदेचा खान यांच्या उपस्थितीत समारोप 


पुणे : "भारतीय संस्कृती जगात सर्वात जुनी असून, त्यात धर्म, जात, पंथांमध्ये कोणताही भेदभाव   नाही. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात आपण ती विसरल्याने, सामाजिक प्रश्न आणि देशांतर्गत संकटे निर्माण झाले आहेत. भारतीय संस्कृतीमधील तत्त्वे आणि मूल्ये प्रत्येकाने आचरणात आणल्यास, जगात खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत होणार आहे," अशी भूमिका केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी जागतिक संसदेच्या समारोपात शनिवारी मांडली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विज्ञान, धर्म/ अध्यात्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित १० व्या जागतिक संसदेच्या समारोप समारंभात खान यांनी आपले विचार मांडले.

या वेळी झोराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेहर मास्टर मूस, पद्मश्री डॉ.चंद्रकांत पांडे पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड,  डब्ल्यू पी यु चे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस संसदेचे मुख्य समन्वयक व, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे, उपस्थित होते.

डॉ आरिफ महंमद खान म्हणाले की, भारतीय संस्कृतीत भेदभाव करण्याबाबत सांगितलेले नाही. येथील नागरिकांचे धर्म, संस्कृती, रूढी परंपरा, खानपान पद्धती या वेगळ्या असल्या, तरी त्यांचे मूळ हे एकच आहे. त्यामुळे आपण भारतीय नागरिक एकच असून, ती संस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. अध्यात्म म्हणजे समोरच्या व्यक्तिबाबत प्रेम आणि आत्मितेयची भावना असणे. ही भावना तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी व्यक्त केली, तर तुमच्यासाठीही अशाच भावना समोरून व्यक्त होतील."

"सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आपल्याला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला संदेश लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्यासाठी सर्व धर्म आणि नागरिक एकसारखे होते. हीच भावना आपल्याला निर्माण करायची आहे. त्याद्वारे आपण देशात आणि जगात खऱ्या अर्थाने  शांतता निर्माण करू शकू,"


गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतीदूतांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याची गरज विश्वनाथ दा. कराड यांनी ओळखली. मानवजातीच्या कल्याणासाठी विज्ञान आणि धर्म किंवा अध्यात्म यांचा मेळ घालण्याच्या स्वामी विवेकानंदांच्या भविष्यसूचक शब्दांवरील त्यांच्या विश्वासामुळे त्यांना विज्ञान, धर्म, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची पहिली जागतिक संसद आयोजित करण्यास प्रवृत्त केले, असे गौरवोद्गार अरिफ महमंद खान यांनी काढले.

यावेळी खान यांनी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पुतळ्याचे कौतुक करीत, डॉ. कराड यांनी हातात भगवत गीता ठेवत जगाला शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्ट केले.

डॉ. विश्वनाथ कराड यांनी जागतिक संसदेची भूमिका विशद करीत, थोर पुरुष आणि विचारवंतानी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे, असे स्पष्ट केले. 

राहुल कराड म्हणाले, आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला अध्यात्म आणि शांततेची आवश्यकता आहे. त्यासाठी जगातील सर्व विद्यापीठांसाठी वर्ल्ड पीस सिलॅबस तयार करता येईल का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. याचा फायदा आपल्याला काही वर्षांनी होईल. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता आहे. आपण भारताला जगाचे विश्वशांतीची राजधानी बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे. विद्यार्थ्यांनी विश्वशांतीचा संदेश जगात चित्रांच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी चित्रांच्या स्पर्धा घेण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले. कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments