मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन
पुणे : गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया, रांजण गावाला गावाला महागणपती, उडवू नको रंग थांब कृष्णा, भेटी लागी जीवा अशा एकाहून एक अप्रतिम भाव आणि भक्ती गीतांच्या सादरीकरणाने भक्ती रंग हा कार्यक्रम रंगला. गणरायाच्या विविध लीलांचे वर्णन आणि विनायकाच्या स्थानांची महती गीतांद्वारे रसिकांसमोर उलगडण्यात आली.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 'भक्तिरंग' या कार्यक्रमाचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तुळशीबाग मंडळाचे विनायक कदम, नितीन पंडित आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये गायक राजेश दातार, राधा मंगेशकर, प्रज्ञा देशपांडे या गायकांनी भक्तीपूर्ण गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. विनीत तिकोनकर (तबला), पद्माकर गुजर (टाळ), केदार परांजपे (कीबोर्ड), प्रसन्न बाम (हार्मोनियम) यांनी साथ संगत केली .प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले.
गजानना श्री गणराया... या गीताने श्री गणरायाचे मंगलमय स्मरण करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या त्या फुलांच्या गंधकोशी... हे गीत राजेश दातार यांनी सादर केले. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले माझे माहेर पंढरी या गीतातून राजेश दातार यांनी रसिकांची वाहवा मिळवली.
राधा मंगेशकर यांनी रांजणगावाला गावाला महागणपती नांदला या अप्रतिम गीताचा सादरीकरणातून रांजणगावातील महागणपतीचे अप्रतिम वर्णन केले. संत तुकाराम महाराज यांची रचना असलेले भेटी लागी जीवा लागलीसे आस हे गीत प्रज्ञा देशपांडे यांनी अतिशय तरलपणे सादर केले.
आज गोकुळात रंग खेळतो हरी, कानडा राजा पंढरीचा, प्रभू तेरे नाम अशा गीतांमधून कलाकारांनी भक्ती रसाचे अप्रतिम सादरीकरण केले. या जन्मावर या जगण्यावर, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, या गीतांनाही रसिकांनी टाळ्यांच्या स्वरूपात भरभरून दाद दिली. कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण आणि त्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर अधिकच रंगत गेला.
तुळशीबाग मंडळातर्फे सुवर्ण महा भिशी योजना ; सामाजिक उपक्रमाला हातभार
तुळशीबाग गणेशोत्सव मंडळातर्फे ९ फेब्रुवारीपासून नगरकर ज्वेलर्स च्या सहयोगाने नागरिकांसाठी सुवर्ण महा भिशी योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कोणताही व्यक्ती दरमहा पाच हजार रुपये गुंतवू शकतो. दर संकष्टी चतुर्थीला या योजने मधून एक भाग्यवान विजेता काढण्यात येणार आहे.
तसेच यातून मिळणारी नफ्याची रक्कम गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक उपक्रमांकरिता वापरण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी मंडळातर्फे देण्यात आले. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी किरण चौहान ९८२३१८७४०९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 Comments