रामनवमी पर्वावर प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची भावना
![]() |
पुणे - आज अखिल विश्वात कोरोना व्हायरसच्या अति सूक्ष्म कणाने मानवजातीला भयभीत करून टाकले आहे. या गंभीर स्थितीत महान तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या संदेशानुसार ईश्वरी कण जगातील मानव जातीला वाचवू शकेल.
या व्हायरसच्या संरर्गाने भयाण शांततेची या जगाने अनुभूती घेतली आहे. संपूर्ण मानवी इतिहासात प्रथमच जगातील सर्व मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा व बुद्ध विहार एकाच वेळी बंद झालं हे पहिल्यांदाच अनुभवले आहे.
भारतीय संस्कृतीच्या संदेशाप्रमाणे विश्वधर्मी मानवतावादी निसर्गधर्माचे आपण पालन केल्यास या कोरोनाव्हायरसची भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु प्रत्येकाने घरात अंतर्बाह्य स्वच्छता ठेवून सर्वतोपरी आहारावर नियंत्रण ठेवावे.
मानवजातीला ध्यान धारणा, प्राणायाम व योग साधनेच्या माध्यामातून प्रसन्न जीवन जगण्याची पूर्णपणे खात्री वाटते. निसर्गाशी अथवा प्रकृतीशी एकरूप झाल्यास पुढील अनेक शतकं मानव सुख समाधानाने नांदू शकेल, अशी भावना एम. आय. टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केली. श्री रामनवमीच्या निमित्ताने डाॅ. कराड यांनी आपले विचार व्यक्त केले.
भगवान श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर डाॅ. कराड म्हणाले की, जगात सर्वशक्तिमान म्हणून ओळखले जाणारे अमेरिका, चीन, इंग्लंड, फ्रान्स, रशिया किंवा इटली, जर्मनी, इराण, कॅनडा यासारखे देशदेखील जीवघेण्या संसर्गाने जगभरात भरडून निघत आहेत.
आज वैश्विक महासत्तांकडे पृथ्वीला दहा हजार वेळा बेचिराख करू शकतील इतके विध्वंसक असे अस्त्र आहेत. हा सगळा शस्त्रसाठा जमवून शेवटी आपण काय साध्य तरी काय केलं. आज एका सूक्ष्म जीवाच्या संसर्गामुळे आपण 22वे शतकदेखील पाहू शकू की नाही, याची शाश्वती देता येत नाही.
संत तुकारामांच्या म्हणण्यानुसार अणू रेणू थोकडा, तुका आकाशा एवढा या उक्तीप्रमाणे, मी विश्वातला छोट्यातला छोटा कण असलो, तरी मी संपूर्ण विश्व व्यापू शकतो. अशी उर्जा किंवा चैतन्य माझ्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी ७0० वर्षांपूर्वी संपूर्ण विश्व हे चैतन्य स्वरूप आहे असे लिहून ठेवले आहे, असेही डा. कराड म्हणाले.
0 Comments